कोल्हापूर : अत्याधुनिक शेती औजारांचा वापर करुन शेतीचे उत्पादन वाढवण्याबरोबर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून जिल्ह्यातील २,२२९ लाभार्थ्यांना १८ कोटी २३ लाखांचे अनुदान मिळाले आहे. चार वर्षात २२ कोटी २८ लाखांचे अनुदान मिळाले. अनुदान वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत शेती यांत्रिकीकरणाला गती दिली आहे.
वाढती मजूरी, वेळेवर मजूर न मिळणे अशा समस्यांत शेतकरी नेहमीच सापडलेला असतो. मशागतीसाठी वेळेवर बैलजोडी उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची कामे खोळंबली जातात. अशावेळी ट्रॅक्टर, रोटावेटर, पॉवर टिलरच्या सहयाने झटपट मशागतीची कामे करण्यावर भर दिला जातो. तसेच सोयाबीन, भात व ज्वारी पिकांची मळणी करण्याकरिता यंत्रांचा वापर होतो. पण यासाठी चांगलीच किमंत मोजावी लागत असल्याने अल्पभूधारक ते अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने यांत्रिकीकरण योजनेला सुरुवात केली.
चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगलाच लाभ घेतला आहे. विविध शेती औजारांच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाद्वारे शेतीची मशागत करताना उदरनिर्वाहाचा एक साधन बनले आहे. त्यामुळे दरवर्षी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. यांत्रिकीकरणाला सुरुवात पहिल्याच वर्षा ९३ लाखांचे अनुदानवाटप करण्यात आले. यानंतर या योजनेचा प्रसार आणि प्रचार झाल्यानंतर दरवर्षी लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. केवळ व्यक्तिगत योजनेचा लाभ न ेता कृषी औजार बँकेची जिल्ह्यात स्थापना करण्यात आली आहे. कृषी औजार बँकेच्या माध्यमातून कमीत-कमी किंमतीमध्ये शेतीची मशागत करून दिली जात आहे. त्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीरण योजनेचा चांगलाच फायदा झाला आहे.
लकी ड्रॉमधून लाभार्थी निवड
कृषी विभागाच्या अनेक योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी नेहमीच होत होत्या. त्यामध्ये वस्तुस्थितीही दिसून येत होती. यामधून मार्ग काढण्यासाठी लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्जासह लकी ड्रॉ काढण्याची पद्धत अवलंबण्यात येऊ लागली. सोडत पद्धतीमुळे एखाद्या लाभार्थ्यांचा यावर्षीच्या सोडतमध्ये समावेश न झाल्यास पुढील वर्षामध्ये त्याला प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. या पद्धतीमुळे गरजू लाभार्थ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ मिळत आहे.
Source: https://maharashtratimes.indiatimes.com