तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्येही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्याचबरोबर सरकारचा देखील शेती तंत्रज्ञानावर भर आहे. व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आता पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष काढण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याला दिल्या आहेत.
पिकांची आणेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आल्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा आणि नुकसान भरपाईपासून वंचित राहतात. पीक कापणीची सर्वेक्षण न करताच जास्तीची आणेवारी दाखवली जाते, असे आरोप होतात. दरवर्षी अनेक गावांमध्ये हीच समस्या येते. हिच परीस्थिती बदलण्यासाठी जुन्या पद्धतीला हात न लावता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यंदा पीक कापणीत होतोय. यासाठी प्रथमच सीसी अॅग्री नावाचं मोबाईल अॅप तयार केलं गेलंय.
दरवर्षी कृषी विभाग, महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फेत ही पीक पाहणी आणि कापणी सर्वेक्षण होतं. खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिनही हंगामात ही पाहणी केली जाते.
या सर्वेक्षणात शेतकऱ्याने शेती कसण्यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान, शेतीला दिलेली खतं, किडनाशकांच्या फवारण्या याची सविस्तर माहिती घेतली जाते. पीक पाहणीनंतर वरिष्ठांच्या उपस्थितीत पिकांची कापणी होते. यामध्ये मिळणाऱ्या उत्पादनाहून प्रतिहेक्टरी पिकाचं उत्पादन काढलं जातं.
शेतकऱ्यांना दरवर्षी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी यंदा पीक कापणी सर्व्हेक्षणात अॅपचा वापर केला जातोय. यामुळे पीक कापणी सर्वेक्षण, पिकाची आणेवारी यात पारदर्शकता येईल. शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास सुलभरित्या नुकसान भरपाई मिळेल.
सीसी अॅग्री अॅपचा उपयोग:
या अँड्रॉईड अॅपच्या वापरामुळे पीक कापणीत पारदर्शकता येणार आहे.
या अॅपवर प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने अकाऊंट असेल.
प्लॉट पाहणीचे फोटो आणि पिकाची उत्पादकता या अॅपमध्ये टाकावी लागेल.
आकडेवारी टाकल्यानंतर त्याची आणेवारी काढण्याचं काम होईल.
अॅपच्या आकडेवारीनुसारच उंबरठा उत्पन्न निश्चित केलं जाईल.
केंद्र सरकार याच आधारावर शेतकऱ्याला नुकसान भरपाई आणि विम्याचा लाभ देईल.
तलाठी, ग्रामसेवकांसह इतर अधिकाऱ्यांना पीक कापणी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जाईल.
Source: http://abpmajha.abplive.in/