मुंबई: राज्यातील 26 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 893 कोटी 83 लाख रुपयांची नुकसान भरपाई, रब्बी हंगाम 2015-16 मधील 8 अधिसूचित पिकांकरिता राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत मंजूर झाली आहे.
बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. लातूर विभागात सर्वाधिक सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 402 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे.
रब्बी हंगाम 2015-16 मध्ये अधिसूचित करण्यात आलेली 8 पिकं: ज्वारी (बागायत व जिरायत), सुर्यफुल, कांदा, उन्हाळी भात, हरभरा, करडई, गहु (बागायत व जिरायत), उन्हाळी भुईमुग
योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी 56 कोटी 91 लाख विमा हप्ता भरुन 24.60 लाख हेक्टर क्षेत्राकरिता 2865.40 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. राज्यातील 34.26 लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या 26.88 लाख शेतकऱ्यांना 893.83 कोटीरुपयांची नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. त्यापैकी शेतकरी विमा हप्ता वजा जाता केंद्र शासनाचा हिस्सा. 408.92 कोटी रुपये व राज्य शासनाचा हिस्सा 408.92 कोटी रुपये अशी एकुण 817.84 कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
भारतीय कृषि विमा कंपनीकडुन एकत्रित नुकसान भरपाई 893.83 कोटी रुपयांची रक्कम संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आलीआहे. संबंधीत बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
विभागनिहाय नुकसान भरपाईची रक्कम :
विभाग | नुकसान भरपाईची रक्कम |
नाशिक विभाग | 32 लाख 22 हजार 923 |
पुणे विभाग | 107 कोटी 36 लाख 32 हजार 918 |
कोल्हापूर विभाग | 10 कोटी 28 लाख 53 हजार 542 |
औरंगाबाद विभाग | 340 कोटी 57 लाख 5 हजार 480 |
लातूर विभाग | 402 कोटी 84 लाख 87 हजार153 |
अमरावती विभाग | 31 कोटी 76 लाख 84 हजार 537 |
नागपूर विभाग | 66 लाख 76 हजार 627 |