महाराष्ट्रात सोयाबीन पिकास पाने खाणा-या अळ्या, खोडमाशी या किंडीचा व तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडमाशीच्या प्रादुर्भाव झाल्यास बाल्यावस्थेत रोपाचे एखादे पान कडेने वाळू लागते आणि त्याची एखादी फांदी सुकलेली आढळते. ब-याचदा ग्रासित रोपांवर जमिनी पासून काही अंतरावर छिद्रेही आढळतात आणि त्यामुळे उत्पादनात १५ टक्केपर्यंत नुकसान संभवते.
पाने खाणारी स्पोडोप्टेरा किडीची अंडी समुहात घातली जातात. अळ्या सुरवातीस समुहानेच पानावर उपजिविका करतात. या अवस्थेत पानांचा पापुद्रा शाबूत ठेऊन केवळ त्यातील हरित द्रव्य संपुष्टात आणतात. त्यामुळे हिरवी दिसणारी पाने पांढरट पडून पारदर्शक होताना दिसतात. तिसरी कात टाकल्यानंतर अळ्या स्वतंत्ररित्या उपजिविका करण्यासाठी शेतभर पसरतात. वाढलेले शरीर, वजन व त्यामुळे वाढलेली प्रचंड भुक यामुळे अळ्या आधाशासारख्या पानावर तुटून पडतात व शेंगेतील दाणे ही खाऊ लागतात.
किडीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी अंडी समुहांचा तसेच समुहाने आढळणा-या अळ्यांचा वेळीच नायनाट केल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळता येतो. रासायनिक किटकनाशकांचा वापर करणे अनिवार्य झाल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के २० मिली, सायपरमेथ्रिन २५ टक्के ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
सोयाबीन पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी), फुलो-यात असतांना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी) पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.